शुक्रवार, २५ मे, २०१२

मी माझ्यातला...


असे शब्दांना कितीदा कुरवाळीत बसायचे?
असे बरेचदा शब्दांनी आभाळ भरून आलं
पण ही धरीत्री मात्र
कोरडीच राहीली


बरच काही लिहायचं म्हणून
शब्द आसडून घेतले
हृदयातली आग पेटली तेव्हा
सगळे कसे करपून गेले



पुष्कळदा पाहिलय
भावनांची हेळसांड होताना
अजूनही गळा भाजून जातो
गारठलेलंही पाणी घोटताना

मी किनारा अजूनही सोडलाच नाही
सबंध बुडालो जेव्हा किनाराच उरला नाही..

मिटलेल्या पापण्यांचा क्षीण अजूनही विरला नाही
ओघळणार्‍या आसवांचा ओघ अजूनही सरला नाही
म्हणता म्हणता कितीक लोटला काळ
लोट अश्रूंचा कुणा अजूनही कळला नाही

कागदावर रेखाटलेल्या ओळींना
एक अर्थच हवा असं कुठे आहे?
या रेषा मनातील तरंग बनले तरी पुरे आहे..